‘मृण्मयी’ मात्र केवळ शब्दकृत्य नव्हतं. तो एक आध्यात्मिक अनुभव होता. अशा तशा कुणाचा नव्हता, तो मीरेचा होता.
मीरा जीवनाच्या उत्तरार्धात द्वारकेला जाऊन राहिली. राजाची राणी असल्यामुळं उणं कुण्या गोष्टीचं नव्हतं. तिच्या इथं जो येई. त्याला इच्छाभोजन मिळे.
एके दिवशी एक तरणादेखणा जोगी येऊन उभा राहिला. त्यानं इच्छाभोजनाचं ऐकून मीरेला तिचं शरीर मागितलं. इवलं हसून नी म्हणाली,
‘‘बस? हेच मागितलंत? ते माझं उरलंच आहे कुठं? ते तर हरिनिर्माल्य आहे. हे माझं सखेसहोदर भवताली बसले आहेत. त्यांच्या समक्ष घ्या ते. विस्कटून टाका. इथंच अंथरुण मागवत्ये!’’
मनूनंही जोश्याला हेच म्हटलं-
‘‘-- हा तर आहे श्रीहरीच्या रूपावरून उतरलेला उतारा. माझी सत्ता तिळमात्र राहिली नाही यावर. तेव्हा हे घ्या. विस्कटा. टाका फाडून-’’
‘‘मात्र जे कराल, ते या माझ्यांच्या साक्षीनं होऊ द्या. या माडांच्या झावळ्या डोलत असोत. रातांब्याची पालवी हालत असो. त्या अवघ्यांच्या कुशीत या शिवनिर्माल्याचं हवं ते होऊ द्या.-’’
हे ज्याला कळलें, त्याला ‘मृण्मयी’ कळली. ती प्रयत्नपूर्वक समजून घ्यायचा विषय आहे. केवळ पानं उलटायचा ग्रंथ नव्हे.
Unbeliveable Character - Meera
Unbeliveable Character - Meera